बोरीवली : १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या दिवसाचे औचित्य साधून ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील समतानगर, बोरिवली पडघा येथील समाज विकास मंडळ व समतानगर येथील ग्रामस्थांच्या वतीने ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन बुद्धविहाराच्या परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामस्थांच्या उपस्थितीत सकाळी पंचशील ध्वजाला मानवंदना देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृष्णा चव्हाण, तर प्रमुख पाहुणे म्हणून पाली डिप्लोमा अभ्यासक सुमित भालेराव व पाली डिप्लोमा अभ्यासक माधुरी भालेराव उपस्थित होत्या. धम्माचे आचरण कसे असावे, तसेच पाली भाषेतील गाथांचे मराठीत अर्थ या वेळी सांगण्यात आले. बुद्धांचे विचार घेऊन चाललो तरच समाजात क्रांती घडू शकेल, असे सांगत विविध मुद्द्यांवर चर्चा करून सुमित भालेराव व माधुरी भालेराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी समतानगर समाज विकास मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश जाधव यांनी, तर सूत्रसंचालन मिलिंद जाधव यांनी केले.
(पाली भाषेतील पहिल्या लघुपटाबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)